भारताचा क्रांतिकारी कामगार पक्षाच्या (RWPI पुढाकाराने, देशभरातील विविध जनसंघटना मिळून 10 डिसेंबर 2023 ते 3 मार्च 2024 या काळात देशव्यापी “भगतसिंह जन-अधिकार यात्रेच्या” दुसऱ्या टप्प्याचे आयोजन करत आहेत.
त्याचसाठी आज पक्षाकडून पत्रकार परिषदेचे आयोजन केले गेले. ह्यात भारताचा क्रांतिकारी कामगार पक्षाकडून साथी परमेश्वर व पूजा आणि सहभागी युवक संघटना नौजवान भारत सभेकडून साथी निखिल ह्यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले.
साथी निखिल ह्यांनी सुरवातीला भगतसिंह जनअधिकार यात्रेची व्यापक भूमिका मांडली. त्यांनतर साथी पूजा ह्यांनी मांडले की 12 मार्च ते 14 एप्रिल 2023 दरम्यान संपन्न पहिल्या टप्प्यानंतर हा दुसरा टप्पा आयोजित करण्यात येत आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान, बिहार, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, दिल्ली, चंडिगढ अशा 13 प्रदेशांमध्ये 80 जिल्ह्यांत जवळपास 8000 किमी प्रवास करून जनतेपर्यंत बेरोजगारी, महागारी, भ्रष्टाचार, धर्मवाद व कष्टकरी जनतेच्या शोषणा विरोधात आणि रोजगार, शिक्षण, आरोग्यव्यवस्था, आवासाच्या मागण्या व झुंजार एकजुटीचा संदेश नेण्याचे काम ही यात्रा करणार आहे.
पुढे साठी परमेश्वर ह्यांनी यात्रेच्या पहिल्या टप्प्याच्या अनुभवांची मांडणी केली व दुसऱ्या टप्प्यातील महाराष्ट्रातील यात्रेचा कार्यक्रम मांडला. ज्यात महाराष्ट्रामध्ये 22 डिसेंबर ते 1 जानेवारी दरम्यान परभणी (22 डिसेंबर), औरंगाबाद (23 डिसेंबर), अहमदनगर (24 डिसेंबर), पुणे (25-27 डिसेंबर), मुंबई (28-30 डिसेंबर) , नाशिक (1 जानेवारी) येथे पदयात्रेचे आयोजन करण्यात येईल.
देशाच्या विविध भागातून आलेले जनसंघटनांचे कार्यकर्ते, सामान्य नागरिक यात सामील होतील. आम्ही सर्व न्यायप्रिय नागरिक, कामगार-कष्टकरी, विद्यार्थी, युवक यांना या पदयात्रेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.
मोदी सरकारच्या कार्यकाळात बेरोजगारी, महागाई प्रचंड वाढली आहे, सामान्य जनतेचे जीवन अत्यंत बिकट झाले आहे. रोजगार वाढीचा दर 0.2 टक्क्यांवर आला आहे, एकेका जागेकरिता 5-6 हजार अर्ज येत आहेत; सर्वत्र फक्त कंत्राटी-जुजबी कमी वेतनाचेच रोजगार शिल्लक राहिले आहेत; जीएसटी व अप्रत्यक्ष करांचा बोजा वाढवून उद्योगपती व कंपन्यांना कर आणि कर्जमाफी दिली जात आहे; राफेल पासून ते अडानी घोटाळ्या पर्यंत अनेक घोटाळे समोर आले आहेत. या सर्वांपासून जनतेचे ध्यान भरकटवण्याकरिता धर्माचे राजकारण वेगाने केले जात आहे, आणि धनबळ व फसव्या प्रचाराआधारे जनतेला भरकटवले जात आहे. या सर्वांच्या विरोधामध्ये तसेच रोजगार, शिक्षण, आरोग्यव्यवस्था, आवास या संदर्भातील मूलभूत मागण्या जनतेमध्ये रुजवण्याकरिता, जनतेच्या झुंजार एकजुटीसाठी आणि प्रबोधनाकरिता ही यात्रा देशाच्या विविध भागांमध्ये आयोजित केली जात आहे.