रोजगार अधिकाराकरिता कामगारांचे पुण्यात भव्य आंदोलन !

नौजवान भारत सभेतर्फे पाठिंबा देण्यात आला

महाराष्ट्र बांधकाम कामगार युनियन तर्फे प्रसारित
31 ऑगस्ट 2021

श्रमिक विश्व फोटो

महाराष्ट्र बांधकाम कामगार युनियनच्या वतीने रोजगाराचा अधिकार आणि कामगारांच्या नोंदणीकरिता आज 31 ऑगस्ट रोजी पुणे येथे कामगार आयुक्त कार्यालयासमोर भव्य आंदोलन केले गेले. पुण्यातील अप्पर डेपो, कात्रज, दत्तनगर, गोकुळनगर, कोंढवा येथील मजूर अड्ड्यावरील शेकडो मराठी व हिंदी भाषिक बांधकाम कामगार यावेळी आंदोलनात सहभागी झाले होते. “कामगार एकजुटीचा विजय असो”, “मजदूर एकता जिंदाबाद’, “भगतसिंह राष्ट्रीय रोजगार हमी कायदा झालाच पाहिजे”, “हर काथ को काम दो, वरना गद्दी छोड दो”, “प्रत्येकाची नोंदणी झालीच पाहिजे”, “बेरोजगारी भत्ता मिळालाच पाहिजे”, “इंकलाब जिंदाबाद”, “कामगारांना पेंशन मिळालीच पाहिजे” या घोषणांनी शिवाजीनगरचा परिसर निनादून गेला होता.

यावेळी युनियनच्या वतीने साथी पवन इन्सान, अमर घनघाव, किशोर कांबळे, बाबा डोलारे यांनी आपले मत व्यक्त केले. सूत्रसंचालन निमिष वाघ यांनी केले. यावेळी घरकामगार संघर्ष समिती सुद्धा आंदोलनात सहभागी झाली, तसेच नौजवान भारत सभेतर्फे पाठिंबा देण्यात आला. घरकामगार संघर्ष समितीच्या वतीने अश्विनी खैरनार, कुसुम रोकडे यांनी आपले मत व्यक्त केले. सर्व कामगार प्रतिनिधींनी आपला रोष व्यक्त करत मांडले की करोना काळानंतर रोजगाराची परिस्थिती अत्यंत बिकट झालेली आहे, कामगार उपाशी आहेत आणि राज्य-केंद्र सरकार त्याकडे गुन्हेगारी दुर्लक्ष करत आहेत. कामगारांच्या नोंदण्या जाणीवपूर्वक रखडवण्यात येत आहेत जेणेकरून सरकारला जबाबदारीमुक्त रहाता यावे. मोदी आणि ठाकरे ही दोन्ही सरकारे फक्त बिल्डर-भांडवलदारांच्या सेवत गुंतली आहेत, आणि बांधकाम कामगार व घरकामगारांना वाऱ्यावर सोडले आहे. यावेळी पाठिंबा देताना भारताचा क्रांतिकारी कामगार पक्षातर्फे कॉ. निखिल एकडे यांनी मांडले की फक्त कामगार वर्गीय़ पक्षच खऱ्या अर्थाने रोजगाराची हमी देऊ शकतो, तेव्हा कामगारांनी आपले आंदोलन फक्त आर्थिक मुद्यांभोवती केंद्रित न ठेवता कामगार वर्गीय राजकारण समजले पाहिजे.

श्रमिक विश्व फोटो

यावेळी युनियनच्या कलापथकाने कामगार चळवळीची क्रांतिकारी गाणी सादर केली.

यावेळी प्रतिनिधीमंडळाला कामगार आयुक्तांनी रखडलेल्या नोंदणी तातडीने पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले तसेच अपघाताने मृत्यू झालेल्या युनियन सदस्य सोपान क्षिरसागर यांना नुकसान भरपाई सुद्धा मंजूर केली. रोजगार अधिकारासंदर्भातील निर्णय हा धोरणात्मक निर्णय आहे, तेव्हा त्याबद्दल मंत्रीमंडळाकडे त्यासंदर्भातील पत्र पाठवल्याची प्रतही उपलब्ध करून दिली.

यानंतर महाराष्ट्र बांधकाम कामगार युनियनचे अध्यक्ष परमेश्वर जाधव यांनी मांडले की आज शेकडोंच्या संख्येने एकत्र आलेल्या कामगारांनी आपल्या एकतेच्या जोरावर काही मागण्यांचे लेखी आश्वासन प्राप्त केले आहे. कामगारांमध्ये जात-धर्म-भाषेच्या नावाने फूट पाडणाऱ्या नेत्यांपासून आणि संघटनांपासून सावध राहण्याचा इशारा देत परमेश्वर जाधव यांनी मांडले की एकता हीच कामगारांची खरी शक्ती आहे आणि जात-धर्म-भाषेच्या भेदांविरुद्ध लढूनच कामगार खऱ्या अर्थाने एक होऊ शकतात. आंदोलनाचा समारोप करत त्यांनी मांडले की महाराष्ट्रामध्ये रोजगार अधिकाराच्या आंदोलनाचा बिगुल फुंकला आहे, आणि राज्यभरामध्ये या मागणीच्या भोवती व्यापक एकजूट बनवण्याकरिता यापुढे युनियन प्रयत्नशील राहील आणि येत्या काळात हजारोंच्या संख्येने मुंबईला मोर्चा नेऊन झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला जाग आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.

श्रमिक विश्व न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here