बांगलादेशमध्ये फळांचे रस बनवणाऱ्या कारखान्याला लागलेल्या आगीत ५२ कामगार होरपळून मेले आणि अनेक प्राणांतिक भाजले आहेत.
आग लागलेल्या इमारतीला असणारे बाहेर जाणारे दरवाजे मॅनेजर / मालकाने बंद ठेवले होते त्यामुळे कामगारांना बाहेर जाता आले नाही असा एक आरोप आहे.
![](https://www.shramikvishwa.com/wp-content/uploads/2021/07/images-38.jpeg)
एप्रिल २०१३ मध्ये ढाक्यातील राणा प्लाझा हि औद्योगिक इमारत कोसळली त्यात ११०० कामगार मृत्यू पावले आणि २५०० कामगार कायमचे जायबंदी झाले होते ; जगाच्या औद्योगिक इतिहासातील काळा दिवस.
इमारतीला भेगा पडल्याचे माहित असून , अनेकांनी इशारे देऊन गारमेंट कंपन्यांनी कारखाने हलवले नाहीत , ना मालकाने भाडे बुडू नये म्हणून इमारत बंद केली.
आणि हि मालिका सुरूच आहे.
जगात घडणाऱ्या प्रत्येक अपघाताकडे दुर्दैवी घटना म्हणून बघणाऱ्या वयाने प्रौढ पण बुद्धीने ८-१० वर्षाच्या आपल्या मित्रांकडे दुर्लक्ष करू या ; आणि त्यातील राजकीय अर्थव्यवस्था समजून घेऊ या.
बांगलादेशच्या जीडीपी वाढीचे डिंडिम सर्वत्र वाजवले जात आहेत ; पण त्याला एक काळीकुट्ट बाजू आहे.
चीनमध्ये वेतनमान वाढायला लागल्यावर , आणि चीनमधून गुंतवणुकी काढून घेण्याचा राजकीय निर्णय झाल्यावर अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी बांगलादेश , व्हियेतनाम आणि काही प्रमाणात भारता मध्ये आपले कारखाने हलवले.
त्यांच्या यजमान राष्ट्राला असणाऱ्या अटी वैश्विक आहेत आणि अजिबात क्लिष्ट नाहीत.
कामगार विषयक कायदे असलेच तर कागदोपपात्री ठेवा ; किमान वेतन , कामगारांची सुरक्षितता , अपघात झाल्यानंतर द्यावयाची नुकसान भरपाई , ट्रेड युनियनला मज्जाव , या सगळ्यातून नक्कीच तयार होणाऱ्या असंतोषाला दंडसत्ता वापरून शांत करणे , कोणत्याही पर्यावरणीय कायद्याचा आग्रह नसणे इत्यादी.
या सगळ्याची अमलबजावणी केली तर त्यांचा भांडवली खर्च आणि उत्पादन खर्च वाढतो , त्याप्रमाणात नफ्याची पातळी घसरते.
या देशातील कामगारांपुढे दोनच पर्याय आहेत.
बेरोजगार राहून भुकेने मरायचे , आपल्या बायका मुलांकडे बघत खंगत कुढत राहायचे,
किंवा
जोखडाखाली मान देऊन एखाद्या अपघातात येऊ शकणाऱ्या मृत्यूची वाट बघायची.
कोट्यवधी कष्टकरी स्वतः एवढे पिचलेले आहेत , काळजीने काळवंडलेले आहेत कि ते स्वतःच्या हिताचा विचार करण्याच्या अवस्थेत नाहीत
माझे अपील आहे तरुणांना , विद्यार्थ्यांना , आर्थिक प्रगतीचा विचार फक्त जीडीपी केंद्री करू नका , मनुष्याला केंद्रस्थानी ठेवा ; बाली सारे दुय्यम.
संजीव चांदोरकर.