
परभणी : ( दि .१० )महाराष्ट्र शासन मंत्रिमंडळाचा 22 मार्च 2022 चा निर्णय आणि वैद्यकीय शिक्षण विभागाचा 28 मार्च 2022 चा शासन निर्णय यानुसार परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयाचे टप्प्याटप्प्याने वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरण सुरू असताना जिल्हा रुग्णालय प्रशासनाने स्वतंत्र Ophthalmology OT उभारण्याचा निर्णय घेतला.
विशेष म्हणजे जिल्हा रुग्णालयाचा नेत्र विभाग हा अनेक वर्षांपासून शनिवार बाजार परिसरातील स्वतंत्र इमारतीत कार्यरत आहे. नेत्ररुग्णांची तपासणी, बाह्यरुग्ण सेवा आणि प्राथमिक शस्त्रक्रिया प्रक्रिया तेथे सुरू असतानाच मुख्य जिल्हा रुग्णालय परिसरात स्वतंत्र OT उभारण्यात आले.
स्थानिक नागरिक व जन आरोग्य अभियानाच्या कार्यकर्त्यांच्या मते, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांना शनिवार बाजार येथील नेत्र विभाग आणि मुख्य रुग्णालय यामध्ये वारंवार प्रवास करावा लागत असल्याने रुग्णांना मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती. त्यामुळे प्रत्यक्ष रुग्णहित लक्षात घेता शनिवार बाजार येथील कार्यरत नेत्र विभागातच अत्याधुनिक OT उभारणे अधिक व्यवहार्य ठरले असते.
मात्र, प्रत्यक्षात रुग्णसुलभता आणि तांत्रिक व्यवहार्यता पूर्णपणे डावलून मुख्य जिल्हा रुग्णालय परिसरातील अडगळीत असलेल्या जागेत मोठ्या निधीतून स्वतंत्र Ophthalmology OT उभारण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे हे OT निर्माण होऊनही मागील तीन-चार वर्षांपासून प्रत्यक्षात कार्यान्वितच झालेले नाही. आजपर्यंत त्या ठिकाणी एकही नेत्र शस्त्रक्रिया झालेली नसल्याची माहिती समोर आली आहे.
देशातील सर्व राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात आरोग्य सेवांचे सर्वाधिक खाजगीकरण झाल्याचे राष्ट्रीय नमुना पाहणी (NSS) च्या 80 व्या फेरीतील अहवालातून समोर आले असताना, दुसरीकडे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेमध्ये उपलब्ध होणाऱ्या शासन निधीचा नियोजनशून्य वापर, अपूर्ण प्रकल्प आणि निष्क्रिय वैद्यकीय सुविधा यामुळे सरकारी आरोग्य यंत्रणेवरील जनतेचा विश्वास अधिकच ढासळत असल्याचे चित्र परभणीतील एका गंभीर प्रकरणातून समोर आले आहे.
राष्ट्रीय नमुना पाहणी (NSS 80th Round) अहवालानुसार महाराष्ट्रात दवाखान्यात दाखल होणाऱ्या एकूण रुग्णांपैकी तब्बल 77 टक्के रुग्ण खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार घेतात, तर सरकारी रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण केवळ 18.6 टक्के इतके आहे. देशातील सरकारी उपचारांचे सरासरी प्रमाण 36.7 टक्के असताना महाराष्ट्र त्यापेक्षा अत्यंत खाली घसरल्याचे वास्तव चिंताजनक मानले जात आहे.
शासन निधीचा अपव्यय की भ्रष्टाचार?
सदर प्रकरणामुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत :





































