
परभणी (विशेष प्रतिनिधी): नागरिकांना प्रशासकीय कारभारात पारदर्शकता मिळावी आणि हक्काची माहिती सहज उपलब्ध व्हावी यासाठी ‘माहितीचा अधिकार अधिनियम, २००५’ लागू करण्यात आला. मात्र, परभणी जिल्ह्यात या कायद्याची पुरती ऐशीतैशी झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र राज्य मुख्य माहिती आयोग, मुंबई यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या एका ऐतिहासिक आदेशाचा संदर्भ देऊन राज्याच्या मुख्य सचिवांना पाठवलेल्या अत्यंत महत्त्वाच्या शिफारशींना परभणीतील जिल्हा प्रशासनाने चक्क केराची टोपली दाखवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. तीन वर्षांपेक्षा अधिक काळ लोटूनही या ६ प्रमुख शिफारशी केवळ कागदावरच राहिल्याने, परभणीत माहिती अधिकार अर्जदारांची ससेहोलपट सुरू आहे.
सर्वोच्च न्यायालयाचा संदर्भ आणि मुख्य माहिती आयोगाचे पत्र
सर्वोच्च न्यायालयाने Write Petition (Civil) No. 990/2021 मध्ये दिनांक १७ ऑगस्ट २०२३ रोजी दिलेल्या आदेशाचा अवमान रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य मुख्य माहिती आयोगाने दिनांक २२ डिसेंबर २०२३ रोजी राज्याच्या मुख्य सचिवांना आरटीआय कायद्याच्या कलम २५(५) अन्वये विशेष शिफारशींचे पत्र पाठवले होते. माहिती अधिकाराच्या कलम ४ अंतर्गत सर्व शासकीय कार्यालयांनी स्वतःहून (Write Petition) माहिती जाहीर करणे बंधनकारक आहे, जेणेकरून नागरिकांना अर्ज करण्याची गरजच पडणार नाही. परंतु, परभणीत या आदेशाला प्रशासनाने वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत.

कागदावरच राहिलेल्या ‘त्या’ ६ ऐतिहासिक शिफारशी
मुख्य माहिती आयोगाने कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ६ अत्यंत महत्त्वाच्या शिफारशी केल्या होत्या, ज्यांची परभणी जिल्ह्यात अंमलबजावणी शून्य आहे:
माहिती स्वतःहून प्रसिद्ध करणे: कलम ४(१) नुसार सर्व शासकीय विभागांनी आपली माहिती सार्वजनिक करणे अनिवार्य असताना, परभणीतील अनेक विभागांनी अद्याप कोणतीही माहिती वेबसाईट किंवा फलकांवर लावलेली नाही.
जबाबदार अधिकारी अनिश्चित: माहिती प्रसिद्ध करण्याची मुख्य जबाबदारी कोणाची? याबाबत अद्यापही सक्षम प्राधिकाऱ्यांची आणि जबाबदार अधिकाऱ्यांची निश्चिती करण्यात आलेली नाही.
१७ मुद्द्यांच्या सुचनांचे उल्लंघन: आरटीआय कायद्यातील कलम ४(१) मधील अत्यंत महत्त्वाच्या १७ मुद्द्यांबाबत (उदा. बजेट, कर्मचाऱ्यांचे वेतन, निर्णय प्रक्रिया) माहिती प्रसिद्ध करण्याबाबत स्पष्ट सूचना निर्गमित करणे आवश्यक होते, परंतु स्थानिक स्तरावर यात कमालीची गुप्तता पाळली जात आहे.
त्रयस्थ पक्षातर्फे पारदर्शक अंकेक्षण (Transparent Third Party Audit) ठप्प: शासकीय कार्यालयांनी माहिती प्रसिद्ध केली की नाही, याचे शासकीय प्रशिक्षण संस्थेमार्फत त्रयस्थ पक्ष अंकेक्षण करणे बंधनकारक होते. परभणीत असे कोणतेही अंकेक्षण झाल्याचे पाहायला मिळत नाही.





































