
वैद्यकीय प्रवेशाच्या जीवघेण्या स्पर्धेत शिक्षणाचा आत्मा हरवत चालला; गरीब विद्यार्थ्यांसाठी संधींचे दरवाजे बंद होण्याची भीती.
परभणी: ( दि.२० मे ) देशातील वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठीची सर्वात महत्त्वाची समजली जाणारी ‘नीट’ परीक्षा पेपरफुटीच्या गंभीर आरोपांमुळे हादरली असून, त्यानंतर निर्माण झालेल्या राष्ट्रीय खळबळीने भारतीय शिक्षण व्यवस्थेतील वाढत्या बाजारीकरणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी निगडीत असलेली परीक्षा संशयाच्या भोवऱ्यात सापडल्याने पालक, विद्यार्थी आणि समाजमनात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे.
या प्रकरणानंतर एक गंभीर वास्तव पुन्हा समोर आले आहे — देशात आणि महाराष्ट्रात फोफावलेली कोचिंग क्लास संस्कृती आता समांतर शिक्षण व्यवस्था बनली आहे का? आणि असल्यास, ती व्यवस्था नेमकी कोणासाठी उभी राहिली आहे?
पालकांच्या स्वप्नांवर उभा राहिलेला अब्जावधींचा शिक्षण बाजार
आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी कोणतीही किंमत मोजण्याची मानसिकता असलेल्या मध्यमवर्गीय कुटुंबांचा अचूक अभ्यास करून, वैद्यकीय आणि अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांभोवती आज हजारो कोटींचा कोचिंग उद्योग उभा राहिला आहे. शिक्षण संस्थांनी गुणवत्तापूर्ण अध्यापन आणि उत्तरदायित्वातून हळूहळू अंग काढून घेत असताना, खाजगी शिकवणी वर्गांनी त्या रिकाम्या जागेवर आपले वर्चस्व निर्माण केले आहे.





































